Thursday 7 July 2011

नजरेत जे सामर्थ्य आहे

नजरेत जे सामर्थ्य आहे 

ते शब्दांना कसे कळणार ? 

पण प्रेमात पडल्याशिवाय 

ते तुम्हाला कसे कळणार ?

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा

काहीतरी देण्यात महत्त्व असतं

कारण मागीतेला स्वार्थ

अन् दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधीतरी माझी चौकशी केली होती

मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती ....v

आज अचानक भल्या पहाटे

"आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकले
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकले

प्रेमाचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या क्षणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या क्षणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"

पहिल्या पावसाची पहिली सर.....

पहिल्या पावसाची पहिली सर.....    

आता नुकतीच बरसली पहिल्या पावसाची पहिली सर
तुझ्या आठवणींचा स्पर्श हळुवार जाणवला अंगभर.....

पावसात भिजलेले क्षण आज पुन्हा डोळ्यात साठले
डोळ्यातल्या आसवांनी धावत पुन्हा आठवणींना गाठले.....

पावसासवे तुझ्या आठवणीही डोळ्यात बरसत राहिल्या
पावसाच्या पाण्याबरोबर त्याही नकळत गालावर धावल्या.....

माझ्या दु:खातही पाऊस आनंदाचे क्षण घेऊन कोसळला
विखुरलेल्या मनाला सावरत जुन्या आठवणीत मिसळला......

पावसाच्या सरी झेलत व्याकूळ मन भूतकाळात रमले
सुखद आठवणींना उजाळा देत दु:खही माझे क्षमले.....

पुन्हा एकदा हिरवळली मनात आठवणींची पाऊल वाट
पहिल्या पावसातल्या क्षणांची ओंजळ भरली काठोकाठ .....

ढगांकडे पाहत मी पावसाच्या सरी झेलत राहिलो
डोळ्यातले अश्रू लपवत बेभान होऊन भिजत राहिलो.....

आई गं...आई गं

आई गं...आई गं...... बछड्यासाठी धाव गं....... तुरुंगात मी माणसांच्या, घे मजकडे तु धाव गं....... खेळण्यास मी आलो होतो, हिरव्या गवता येथ भुलुनी.... मान पकडली या लोकांनी, हिरवा पाला मज दावुनी....... आण कुणा मज सोडविण्या, ओरड्तोय मी फ़ार फ़ार गं...... बुभुक्षित हे मानव जमले, करण्या मजला ठार गं....... आई...आई...ये ना गं, मम्मे..खम्मे....ये ना लवकर सांग ना कसायास या, बघ बांधतो खुंट्यास कसा...... बाळ तुझा चिमुकला आज, बघ धडपडतोय आज असा........ कोवळ्या बाळास खाण्या, जमाव अगदी निर्लज्ज आहे....... खवखवलेला सुरा कधीचा, कापण्यास कसा सज्ज आहे....... आई नको वाचवुस मजला, बस्स पाहीन तुला अखेरी...... दादास पण सांगुच नको, अंत असा माझा अघोरी....... आताच तर आलो ना गं. मग बोलावतो देव का गं........ मारल्या हाका जेथुनी मी, कापणार ही मान का गं....... आई...आई ये गं....ये गं, तो जवळ माझ्या येतोय..... आतातरी सोडव ना गं मला, तो प्राण हिरावुन नेतोय........ मम्मी.....आई......आई.....आई, दाबली ही मान माझी...... डोळ्यात तुला आठवतोय गं...... आ..... ---संतोष

लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
समाजाचं अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं.
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

कायदा सुव्यवस्थेला, कुणी भीत नाही राजे,
सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे,
आया, बहिणी, लेकी, सुना, पवित्र राहिली नाहीत नाती,
शासन करणाऱ्या तलवारीचीच गंजून गेलीयेत पाती.

आपल्या आब्रूचे लक्तर, आब्रू झाकण्यासाठीच मागावं लागतं,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

हिंदवी स्वराज्य स्थापन करून, तुम्ही निघून गेलात राजे,
राष्ट्र प्रेमच स्फुल्लिंग करून, तुम्ही निघून गेलात राजे,
पण... या पेटलेल्या राष्ट्रप्रेमावर, स्वताचीच पोळी भाजणाऱ्या...
आणि आमचीच मतं घेऊन, शेवटी सत्तेने माजणाऱ्या.

गल्लीबोळातल्या पुढाऱ्याला, "रयतेचा राजा" म्हणावं लागतं,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

इंग्रज इथं दीडशे वर्षे राज्य करून निघून गेले,
भारतीयांचं काय पाणी, ते भारतात राहून बघून गेले,
भारतीय संस्कृतीच्या छाताडावर, आता पाश्चात्य संस्कृती नाचतेय,
महाराष्ट्रीय तुतारीच्या नावाखाली, इथे इंग्रजीचीच पिपाणी वाजतीये.

माय मराठी मरतेय राजे आणि इंग्रजीला पालखीत बघावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

ज्यांच्याकडे पैसा आहे, त्याचं जगणं झालाय मस्त,
नी पोटासाठी राबनाऱ्याच, इथं मरण झालाय स्वस्त,
किड्यामुंग्यासारखी इथं, जगताहेत मानसं,
दिवसाढवळ्या, आपलं मरण बघतायेत मानसं.

वेदना असह्य होतात, म्हणून इच्छा मरण मागावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

तुमच्या सारखा छत्रपती पुन्हा इथे झाला नाही,
पुन्हा कुठल्या जिजाऊ पोटी शिवबा जन्माला आला नाही.
घराघरातल्या जिजाऊ आता, करियर वूमन होत आहेत,
संस्कार करण्या ऐवजी पोराला, पाळणाघरात देत आहेत.

कुत्र आई नी पोरगं दाई कडे असलेलं बघावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

आता एक करा राजे, या पुढे प्रेरणा कोणाला देऊ नका,
अन कृपा करून तुम्ही आमच्या स्वप्नातही येऊ नका..
काय सांगू राजे, आता इथल्या तरुणाई बद्दल बोलवत नाही,
नी तुमच्या आदर्शाच ओझ, इथल्या तरुण खांद्यांना पेलवत नाही.

कर्तव्य विसरून आमची तरुणाई, आपल्याच मस्तीत मग्न आहे,
घराघरातील मूर्ती तुमची, मनामनात भग्न आहे.

तुमच्या जयंतीला राजे, वर्षातून दोन वेळा नाचावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

अन्याय, अत्याचार, अधर्मावर, इथल्या माणसाचं जीवापाड प्रेम जडलंय,
आणि हिंदू पतपातशाहीवर राजे,दहशतवादच सावट पडलंय.
बॉम्बस्फोटाच्या भीतीने, वारा सुगंध देत नाही,
नी आपल्याच मातृभूमीत राजे, मोकळा श्वासही घेता येत नाही.

गुंड सुटतात मोकाट आणि निर्दोशांना वर्षानुवर्ष न्यायालयात लढावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

स्वराज्य इथ आहे राजे, पण सुराज्याचा पत्ता नाही,
म्हणतात ना... कौरव सारे माजले आहे आणि पांडवानाच सत्ता नाही
विरोध करण्याची हिम्मत जाऊन, निष्क्रीयताच पक्की मुरली आहे,
माझीही तलावर बोथट झालीये, आता फक्त शब्दांनाच धार उरली आहे.

समाजपरिवर्तनाच चक्र इथं, दुबळ्या हातांनाच फिरवावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

ताठ मानेनं जगावं म्हटलं, तर राजे, आपलीच मानसं जगू देत नाहीत,
आणि भ्रष्टाचारमुक्त, अखंड भारतच स्वप्न बघू देत नाहीत.
आता हीच निष्क्रिय मानसं, माझा सर्वस्व लुटतील,
आणि तुमच्यावर कविता लिहिली म्हणून माझ्या जीवावर उठतील.

तरी बरं तुमचंच रक्त वाहतंय, माझ्या नसानसामधनं म्हणून लिहावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

जातील राजे, नक्की जातील, "हे हि दिवस" एकदिवस,
स्वताच्या चुकांची जाणीव होयील, प्रत्येकालाच एकदिवस.

मात्र त्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न हवेत करायला,
बुडणाऱ्याला काडीशिवाय, दुसरं काय लागतं तरायला?

पुन्हा एकदा त्याच डौलानं, भगवा झेंडा फडकणार,
कुणाच्याही चिथावणीने, आमची माथी नाही भडकणार.

आता आम्ही विचार करू, रायते साठी कष्ट करू,
समाज बदलण्यासाठी राजे, स्वतापासून सुरुवात करू.

तुमचेच वारस आम्ही राजे, फक्त रक्त उसळाव लागतं
हा समाज बदलण्यासाठीच राजे, या जगात जगावं लागतं...

                                                                                मुळ कवी- पुष्कर घाटपांडे

"माझ्यावर कविता कर ना"

ती नेहमीच म्हणायची "माझ्यावर कविता कर ना",
मला तेव्हा कळायचे नाही नक्की काय आणि कशी कविता करू ते.कारण आमची मैत्री ही फेसबुक मधली त्यामुळे फक्त सेलवर जे बोलणे होयचे तेव्हडेच मी तिला ओळखत होतो.
तिला सारखा मी सांगायचो " कविता करू कशी, अशी होत नाही कविता त्यासाठी तुला पूर्ण जाणून घेयला हवे".
ती म्हणायची "माझा फोटो पाहून कर ना तेव्हा तर जमेल ना"

मी म्हणायचो " कशी होणार ग फोटोत तुझा नेहमी एकाच भाव असतो प्रसन्न, त्याशिवाय दुसरा काही अर्थ लागत नाही फोटो पाहून "
मी म्हणालो "एकदा भेट आपण खूप गप्पा मारू मग नक्कीच होईल कविता ".
मग ठरल्या प्रमाणे आम्ही एके दिवशी भेटलो चांगल्या २-१ तास गप्पा मारल्या.
तेव्हा तिचे निरीक्षण केले तिला काय आवडते, काय नाही, तिचे बोलणे, तिचे हसणे, तिच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी, तिचे ध्येय सगळे सगळे.
तिचा निरोप घेतल्यानंतर काही क्षणात सगळे शब्द जुळून आले आणि ही कविता जन्माला आली.
या कवितेला नाव काय द्यावे हे मात्र अजून कळले नाही..

माझी कागदाची होडी....

आज सुटली वेगाने,
माझी कागदाची होडी....
भर पावसात होती,
हेलकावे घेत थोडी.....

पाणी आहे सारे सारे,
थेंब गार गार सारे....
कसे गोठवत आहे,
झोंबणारे न्यारे वारे....

माझ्या राहत्या घराला,
सारा पाण्याचा गराडा....
पण दुर गेला फ़ार,
पुर्‍या अंगाचा उकाडा....

सारी जमलेली पोरं,
पाण्यामध्ये चिंब चिंब...
वर पाहुन आभाळी,
मुखी टिपलेले थेंब...

भिजणारी झाडे होते,
उभी तिथंच निमुट....
पानं पानं होती मग्न,
सुखस्वप्नांचीच लुट....

सारी गल्ली सुनीसुनी,
फ़क्त पोरांचा घोळका...
पावसाच्या सरीमध्ये,
सुरु स्वच्छंद गलका.....

तो बरसावा म्हणुन,
मी केली लाडीगोडी......
फ़ार सुटली वेगाने,
माझी कागदाची होडी......

सखी

सखी -
जणू ती मला भेटली, आणि मी पूर्ण बदलूनच गेलो,

दुपारपर्यंत झोपणारा मी, तिला भेटण्यासाठी लवकर उठू लागलो.

...



रोज कट्यावर बसणारा मी, तिच्यामुळे वर्गात बसू लागलो,

कट्यावर बसून टपोरीगिरी करणारा मी, वर्गात लेक्चर ऐकू लागलो.





कॉलेजला बाईकवर जाणारा मी, तिच्यासाठी बसने जावू लागलो,

स्पाईक केलेल्या माझ्या त्या केसांचा, आता भांग पाडू लागलो.





तिच्यामुळे जीन्स टीशर्ट सोडून, फोर्मल्स घालू लागलो,

देवावरील तिच्या श्रद्धेमुळे, भक्तीगीतेही ऐकू लागलो.





तिला सिनेमा आवडत नाही, म्हणून नाटक पाहू लागलो,

मध्यांतरात पोपकॉर्ण नाही, तर कुल्फी घेऊ लागलो.





प्रत्येक रविवारी तिच्यामुळे आता, समुद्रावर जावू लागलो,

कधीच न खाल्लेले ते चने किनाऱ्यावर तिच्याबरोबर खाऊ लागलो.





इतकी वर्ष टपोरी दिसणारा मी, आज रुपेरी दिसत होतो,

बाबांकडून ही न बदललेला मी, आज तिच्यामुळे पूर्ण बदललो होतो.





हे सारे ऐकल्यावर तुम्हाला, वाटली असेल गम्मत,

पण तिची माझ्या आयुष्यात, खूप आहे किंमत.





अहो, ती मला भेटली, अन मोठी जादूच झाली, तिच्या सहवासात एक चांगली गोष्ट घडली,

ती कधीही, मला भेटायला बोलवायची, अन त्याच भीतीमुळे, माझी (सि***ची) वाईट सवय सुटली.





आज मला कळाले की मुली धोकाच नाही तर, प्रेम ही करतात,

माझ्या सारख्यांना वाईट मार्गावरून, एका चांगल्या मार्गावरही आणतात.





आज या निसर्गाला हात जोडून प्रार्थना केली,

माझ्यासारखा प्रत्येकजण बदलेल, पण प्रत्येकाला 'ही' नाही, हिच्यासारखी जर का सखी भेटली.

मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले

मूळ कविता : मेघ नसता वीज नसता
मूळ कवी : संदीप खरे


मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले
जाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले!
(रस्ता रोडरोलरला म्हणतो)
जाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा?
तू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले!
एवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा?
मुंगळेही डांबरावर भार वाटू लागले
लाख रस्ते मारण्याचे, यम तरीही हळहळे
सापळे सारे कसे एकाच शहरी लावले!
चालताना रंग उडुनी होई चेहरा पांढरा
तेच ते ड्रेनेज उघडे बघ सुगंधू लागले...
भर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली
खोदती रात्री तुला जे, भय तयांचे वाटले

"मित्रमराठी"~ आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?

लहान असताना आयुष्य कसं, आनंदाने भरलेलं असतं
मोठे होईपर्यंत त्याचं गमक, आपल्याला मुळी कळत नसतं
हळू हळू शाळा संपते, कॉलेज ची वाट मोकळी होते
जमिनीवर चालता चालता, जिंदगी आपल्याला हवेत नेते
हळूच डोकावणाय्रा अक्कलदाढेचं, कौतुक आमचं संपत नसतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
कॉलेज संपतं, आम्ही नोकरी शोधतो
त्यानंतर  छोकरी पाहून, एका नव्या बंधनात अडकतो
आईच्या हाती बनलेलं जेवण, दोन वेळा आम्हाला हवं असतं
रात्री बायकोच्या कुशीत शिरून, गाढ झोपून जायचं असतं
आपल्या माणसांच्या सहवासात, सगळं आयुष्य घालवायचं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
दिवसांवर दिवसांच्या राशी, प्रश्न नवे दर दिवशी
जगात काय चाल्लंय? माझा काय घेणं त्याच्याशी?
दुनियेच्या राजकारणात आम्हाला, अजिबात पडायचं नसतं
सामाजिक प्रश्न; आणीबाणी, याशी आमचं काही नातं नसतं
आम्ही आमच्या लहान विश्वात, आमचं सुख शोधलेलं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
असच आयुष्य पुढे सरकतं, मुलाबाळांनी घर फुलतं
नव्या जबाबदाय्रांमध्ये आम्ही, पुरते अडकून बसतो
त्याचं बालपण त्याचं शिक्षण, ह्यातच आम्ही हरवून जातो
दर वर्षी सुट्टीत एकदा, महाबळेश्वर ला फिरून येतो
त्या क्षणांच्या आठवणींवर आमचं, पूर्ण वर्ष सुखात जातं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
हळू हळू  जगता जगता, आमचं वय दिसू लागतं
सगळं आयुष्य मग, मुलांच्या खांद्यावर विसावतं
"सांभाळून घेतील आपल्याला", असा कायम समज असतो.
आणि आयुष्याच्या ह्या लढाईत मात्र, आम्ही बहुतेक हरलेले असतो
थोडासा आधार आणि नातवंडांचं, भरघोस प्रेम हवं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
आयुष्याचा अंत जवळ येतो, आपण जुन्या आठवणी शोधू लागतो
काही मागे राहायला नको, सगळे क्षण आठवत राहतो
तीच तर शिदोरी असते, जाताना मनात साठवून न्यायची
बहुतेक पूर्तता झालेली असते, आमच्या बय्राच  इच्छांची
समाधानाचे अनंत श्वास, आपण अशा वेळी उपभोगत असतो
आणि आमच्यासारख्यांना मरण्यासाठीही आणखी कुठे काय हवं असतं?????